Spread the love

निगडी- संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून रोजी देहूतून प्रस्थान करून १९ जून रोजी पिंपरीतील भक्ती-शक्ती चौकात आगमन करणार आहे. विठोबा माऊलीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी भक्तिभावाने या पवित्र वारीत सहभागी होतात. मात्र, या भक्तिमय उत्सवाच्या समाप्तीनंतर मागे राहातो तो कचरा आणि अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न. वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक संस्था, नागरिक आणि हॉटेल्स अन्न-पाण्याची सेवा करत असले तरी वारी संपल्यावर उरतो तो कचर्‍याचा डोंगर, जो शहराच्या सौंदर्यावर आणि नागरिकांच्या मनावर वाईट परिणाम करतो.

“स्वच्छता हा खरा धर्म आहे, गलिच्छपणा हा पाप आहे,” असे सांगणाऱ्या संत गाडगे महाराजांचे तत्त्व वारीनंतरही जपणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघ मान्यताप्राप्त ‘earth’ आणि ‘पिंची’ या दोन संस्थांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसोबत मिळून भक्ती-शक्ती चौकात स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात दोन्ही संस्थांच्या १५० महिला स्वयंसेवक सहभागी होणार असून, वारीनंतर झालेला कचरा सफाईची जबाबदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) सोबत आपल्या खांद्यावर घेणार आहेत.

या मोहिमेचे नेतृत्व ‘earth’ एनजीओच्या सीईओ प्रविणा कलमे आणि ‘पिंची’ च्या संस्थापक पूनम परदेशी म्हणतात, “वारीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या कचर्‍याचे व्यवस्थापन केवळ प्रशासनासाठी खूप कठीण आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान या स्तुत्य उपक्रमाला सहकार्य करण्याच्या हेतूने आम्ही ‘earth’ आणि ‘पिंची’ संस्थांनी मिळून पुढाकार घेतला आहे. ही केवळ स्वच्छतेची जबाबदारी नाही, तर ही आमच्या विठोबाप्रती असलेली भक्तीची आणि सामाजिक जाणिवेची अभिव्यक्ती आहे. भक्तीसह आपण भोवतालच्या पर्यावरणाची जबाबदारीही घेतली पाहिजे असा एक सामाजिक संदेशही या उपक्रमातून दिला जात आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button